–
कोणे एकेकाळी चिपळूण ही संपूर्ण कोकणपट्टीची सांस्कृतिक राजधानी होती आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे या राजधानीचे वैभव…पण आता राजधानी सोडा साधी वाडीपण राहिली नाही आणि सांस्कृतिक केंद्र तर स्वार्थी राजकारणाचा अड्डा झाले. २००५ च्या महापुरात सांस्कृतिक केंद्र बुडालं आणि त्याची रयाच गेली. त्यानंतर तत्परतेने केंद्राची दुरुस्ती होणे आणि ते रसिकांच्या सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. चांगल्या नाटकांची, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणे अपेक्षित होते. खऱ्या अर्थाने हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे राहणे गरजेचे होते. ही जबाबदारी मुख्यत्वे चिपळूण नगरपालिकेची होती. त्यानंतर पालिकेला प्रसंगी निधीसाठी मदत करण्याची जबाबदारी येथील आमदार, खासदार आणि मंत्रिपद भूषविणाऱ्यांची. चिपळूण नगरपालिका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चालविणाऱ्या रमेश कदम यांची तर जबाबदारी नक्कीच जास्त होती. त्यांनी किती प्रयत्न केले… की केले नाहीत, केले असतील तर प्रामाणिकपणे आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन केले का याबाबत साशंकता आहे. हीच गोष्ट आमदार भास्कर जाधव यांची. कदाचित दोघांनी प्रयत्न केले असतील पण पालिका आणि शहराच्या राजकारणातील शह काटशहच्या खेळात केंद्राचा मात्र जीव गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
चिपळूण शहराचा आज जो काय
‘ प्रचंड विकास ‘ दिसतोय आणि अपल्यासकट बाहेरच्यांचे डोळे दिपतात ते या शह काटशहच्या स्वार्थी राजकारणामुळेच…पालिकेत निवडून जाणारे सर्वपक्षीय नगरसेवक नेमके कशासाठी जातात… येणारे मुख्याधिकारी आणि वर्षांनुवर्ष इथेच असलेले कर्मचारी प्रचंड मेहनत घेतात ती शहराच्या विकासासाठी की स्वतःच्या विकासासाठी हा प्रश्न सर्वसामान्य चिपळूणकर जनतेला वर्षानुवर्षे सतावत आहे, नव्हे डसतो आहे. (यातील जे प्रामाणिक आहेत त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, त्यांनी स्वतः बद्दल अभिमान बाळगावा. जे प्रामाणिक नाहीत त्यांना भैरीचा
‘ प्रसाद ‘ मिळेलच असा विश्वास वाटतो.)
चिपळूण पालिकेत गेल्या काही वर्षांत ज्या पद्धतीने कारभार चालू आहे आणि प्रामुख्याने तंगडीत तंगडी अडकवून विकासाचा खेळखंडोबा सुरू आहे ते पहिले की एखाद दिवशी अख्खी पालिका विकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( सुदैवाने हा दिवस पाहण्याची वेळ चिपळूणकर जनतेवर येऊ नये. सध्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या पालिकेतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी किमान एवढी कृपा करावी. श्री भैरीनेही त्यांना सुबुद्धी द्यावी)
सध्या वर्षभर केंद्राचा विषय नुसताच ऐरणीवर आला असे नाही तर ‘ पारावर ‘ आला आहे. केंद्राचा पडदा उघडण्याची शक्यता धूसर होत गेली तशी कलाकार मंडळी पारावर आपली कलेची आवड जोपासू लागली. केंद्राची घंटा कधी वाजेल याचा नेम नाही पण गेल्या वर्षा दीड वर्षांत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नुसत्या आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातही एवढा गोंधळ आहे की कोण कोणाच्या बरोबर आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे आणि सर्वजण नेमके कशासाठी भांडत आहेत, कायद्याचा, तक्रारींचा कीस काढत आहेत हेही कळत नाही. यातले कोणतेही भांडणं टक्केवारीसाठी नाही असे ठामपणे सांगितले जात आहे. सर्व भांडण आहे ते तात्विक. स्वच्छ, दर्जेदार कामासाठी आणि चिपळूणचे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करण्यासाठी…(वाचकांना एकदम पालिकेत रामराज्य अवतरल्याचा भास होऊन धक्का बसला असेल तर मी जबाबदार नाही)
या सर्व प्रामाणिक हेतूनेच सांस्कृतिक केंद्राचे घोंगडे भिजत घातले आहे. ज्याला जशी सवड मिळेल किंवा सोईस्कर पडेल तेव्हा तेव्हा तो घोंगडं धुवत बसतो. गेली सोळा वर्षे हे सुरू आहे आणि यापुढेही असेच चालेल असे वाटते. आता तर केंद्राचे घोंगडे जवळजवळ कुजले आहे. महापुराने केंद्रात जेवढा चिखल झाला नाही त्यापेक्षा कित्येक पटींनी स्वार्थी, मतलबी राजकारणाचा चिखल झाला आहे. या चिखलात तब्बल एका पिढीची सांस्कृतिक भूक या चिखलाच्या दुर्गंधीने विरून गेली. अनेक होतकरू कलाकारांच्या कलेचा, आशा आकांक्षांचा चिखल झाला. नटश्रेष्ठ स्व. काशिनाथ घाणेकर यांच्या गावातल्या सांस्कृतिक केंद्राची ही परिस्थिती बघून कोणालाही राग येईल. देशाच्या आयर्न लेडी आणि देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या स्व. इंदिरा गांधी यांचे नाव केंद्राला दिले आहे त्याची अशी वाट लावताना आणि खेळखंडोबा करताना संबंधित सर्वांनीच जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी.
ता . क. केंद्राचे काम चालू असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले असते, योग्य वेळी योग्य सूचना केल्या असत्या आणि योग्य ते बदल केले असते तर केंद्राचा पडदा उघडण्यास कदाचित इतका उशीर झाला नसता असं वाटतं. परंतु एकमेकांचे वस्त्रहरण करण्याची संधी कशी सोडायची असा प्रश्न पडला असावा. पैसा, टक्केवारी असलं पाप कोणाच्याही मनात नसणार नक्की. एवढी निस्वार्थी सेवा दुसरं कोणीही करणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
९८५०८६३२६२