येवा (आणि बुडा), समुद्र तुमचाच असा!

0
1029
बातम्या शेअर करा

फाजील आत्मविश्वास आणि बेशिस्तीची परंपरा अखंड ठेवत गेल्या महिन्या दोन महिन्यात कोकणातील विविध समुद्र किनाऱ्यांवर आगाऊ पर्यटकांनी आपले बळी दिले. बळी दिले असेच म्हटले पाहिजे कारण समुद्र आहे तिथेच आहे. जसा आहे तसाच आहे. मागे जाण्याची आणि पुढे येण्याची मर्यादा त्याने कधीच ओलांडलेली नाही. त्यामुळे अमक्या अमक्या ठिकाणच्या समुद्राने पर्यटकांचे बळी घेतले असे म्हणणे म्हणजे खूपच मोठा अन्याय आहे. तो बळी घेत नाही तर बळी देण्याची किंवा जाण्याची हौस ही आपल्या बेशिस्त आणि आगाऊ पर्यटकांची असते, त्याच्याशी समुद्राचे काही देणेघेणे नाही. आगाऊपणामुळे, बेशिस्तीमुळे बुडणार आपण, जीव घालवणार आपण आणि कारण नसताना बदनामी मात्र समुद्राची. या बळी जाण्यामुळे अनेक समुद्र किनारे बदनाम झाले आहेत. त्यामुळे शिस्त पाळणारे, खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या लोकांमध्येही विनाकारण भीतीचे वातावरण तयार होते. त्याचा फटका अशा अनेक सुंदर सुंदर समुद्र किनाऱ्यांना पर्यायाने स्थानिक पर्यटन उद्योगाला बसतो.
आज सुशिक्षिततेचे प्रमाण मोठे आहे. बहुतांशी पर्यटकांना लिहिता वाचता येते. टीव्ही, वृत्तपत्र, सोशल मीडिया आदी माध्यमातून समुद्र किनाऱ्यावर बेशिस्त आणि अतिशहाणे पर्यटक बुडल्याच्या बातम्या कळतात. स्थानिक प्रशासन, लोकं, व्यावसायिक, टूरिस्ट गाईड वारंवार सूचना देत असतात, समजावून सांगत असतात, जे अधिक सज्जन असतात ते हात जोडून विनंतीही करतात, पण ऐकणार कोण? आणि मुळात ऐकायचं का? आम्ही हौसमौज करायला येतो, पैसे उडवायला येतो, आम्हाला सगळं कळतं, आम्हाला पोहता येतं त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका असाच आविर्भाव अनेक पर्यटकांचा असतो. आणि याच मस्तीत, याच मग्रुरित पर्यटक समुद्राच्या पाण्यात जातात. नको तितके आत जातात आणि मग लागतात गटांगळ्या खायला..मग आरडाओरडा, ‘वाचवा वाचवा’ चा टाहो, मग स्थानिक प्रशासन, लोकं, सुरक्षारक्षक यांच्यात देवदूत दिसायला लागतो. त्यांच्यापैकी कोणीतरी आपल्याला वाचवावे असं वाटतं. आपला मित्र, मैत्रीण, मुलगा, बाप, आई, विद्यार्थी, शिक्षक डोळ्यासमोर बुडताना पाहणे किती वेदनादायी असेल हे आपण सर्वजण जाणतो. त्याची कल्पना करू शकतो, पण वेळ निघून गेलेली असते. आपल्या मस्तवालपणाला मिळालेली ही थप्पड असते आणि ती इतकी सणसणीत असते की सुधारण्यासाठी संधीच मिळत नाही. त्यातूनही ज्यांच्या नशीबाची दोरी फारच मजबूत ते वाचतात पण त्यांना पश्चात्ताप होतो की नाही, त्यातून ते स्वतः सुधारतात आणि दुसऱ्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात का हा खरा मुद्दा आहे.
आपली कोणतीही चूक नसताना काही बाह्य कारणांनी जीव धोक्यात येतो तेव्हा इलाज नसतो, परंतु जाणूनबुजून केलेल्या चुकांमुळे, बेशिस्त आणि बेफिकिरीमुळे पर्यटकांचा जीव जातो तेव्हा वाईट वाटतेच पण त्यापेक्षाही अधिक संताप येतो. काही काही पर्यटकांना गाडीतून उतरतो कधी आणि समुद्रात जातो कधी असे होऊन जाते. थोडा वेळ झाला तर कदाचित समुद्र आटेल अशी त्यांना भीती वाटत असावी. अनेक श्रीमंत आणि हायफाय गाड्यावाले विशेषतः तरुण पोरं पोरी यांना किनाऱ्यावर आतपर्यंत गाडी नेण्याची आणि स्टंट करण्याची सुरसुरी येते. पोटात दोन पेग गेले असले तर तर बघायलाच नको. याच मस्तीत जेव्हा गाड्या वाळूत रुततात, भरती असेल तर बुडतात तेव्हा त्यांची धुंदी, गुर्मी उतरते. काही वेळापूर्वी सावध करणारा वेडगळ, मूर्ख स्थानिक त्याला एकदम देवदूत वाटायला लागतो. असे बळी जाणं चांगलं नाही, त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात हेही खरं आहे पण वारंवार सांगूनही, जनजागृती करूनही, विविध माध्यमातून माहिती मिळूनही सुधारणा होत नाही या गोष्टीची चीड येते. कधी कधी बर झालं अशीही भावना होते. कारण पुढच्याला ठेच लागली असेल तर मागच्याने सावध व्हायला पाहिजे एवढी तरी अपेक्षा माणूस म्हणून असणारच.
हा मुद्दा केवळ समुद्र किनाऱ्यांपर्यंत मर्यादित नाही. हे एक उदाहरण झाले. डोंगरदऱ्या, कडेकपाऱ्या, नद्या, जंगले, धबधबे अशा अनेक ठिकाणी बेशिस्त , आगाऊ पर्यटकांची काही कमी नाही आणि त्यामुळे दुर्घटना, बळींची पण कमी नाही.
समुद्र किनारे असोत, डोंगरदऱ्या असोत नाहीतर धबधबे असोत ते जसे आहेत आणि जिथे आहेत तिथे आपल्या मर्यादेत आहेत. त्या मर्यादेत राहूनही ते आपल्याला आनंद देतात, तनामनाला ऊर्जा देतात. आपणच आपल्या मर्यादा ओलांडून जीव धोक्यात घालतो. सध्या सेल्फी ने एक मरायची नवीन संधी दिली आहे अर्थात बेशिस्त, आगाऊ पर्यटक किंवा व्यक्तिंना. सेल्फी म्हणजे ‘सेल्फ डेथ’ च ठरत आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचे मरण ओढवून घेणे. मृत्यूची सेल्फ सर्व्हिस!

ता. क. काही किनाऱ्यांवर सुरक्षारक्षक नाही, साधनसुविधा नाही, सूचना फलक नाही अशी ओरड होते. या गोष्टी पर्यटनासाठी महत्वाच्या आहेतच. तरीही यातलं काही नाही असे गृहीत धरले तरी देवाने आपल्याला थोडासा विचार करण्याइतपत अक्कल नक्कीच दिली आहे. त्यात आपण एकविसाव्या शतकातील सुजाण, सुशिक्षित नागरिक आहोत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अशा बळींसाठी आपणच जास्त जबाबदार आहोत यात वाद नाही.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here