शृंगारतळी – (मंगेश तावडे ) : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळीमध्ये सद्या गोरगरिबांना आणि शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देऊन सावकार लुटत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुद्दल नको पण व्याज आवर असाच काहीसा सूर गुहागर तालुक्यात पहावयास मिळत आहे.
शृंगारतळी हे गुहागर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ याच ठिकाणी आहे. याठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिक बँकेचे कर्ज काढून किंवा सोने दागिने गहाण ठेऊन आपला व्यवसाय करीत आहेत मात्र सद्या याच शृंगारतळीत २५ टक्के व्याजदराने पैसे देऊन सावकारकी सूरू आहे. एखादा व्यापारी किंवा शेतकरी याला जर पैशाची गरज असेल तर त्याला हे सावकार गाठतात व आपण तुम्हांला लागेल तेवढे पैसे देऊ असे सांगून त्याच्याकडून कागदोपत्री करारही करतात. मात्र प्रत्यक्षात त्या कागदावर दोन टक्के व्याजदराने कर आकारले जाईल असा लिखित करार असतो तर पैसे घेताना मात्र अनधिकृतपणे २५ टक्के व्याज आकारले जात असल्याची चर्चा सुरू आहे. ३० दिवसांसाठी हे व्याज असून जर त्यापुढे एकही दिवस जर गेला तर त्याच व्याजावर प्रत्येक दिवशी २५० रूपये व्याजदर घेतला जातो. त्यामुळे याठिकाणी सावकारकीला अच्छे दिन आल्याचे दिसते. याबाबत अनेकांना पैशाची गरज असल्याने ते कोणतीही तक्रार किंवा कुरबूर न करता या सावकारकीच्या मोहाला बळी पडत आहेत मात्र असे असले तरी संबंधित यंत्रणेने याकडे जर दुर्लक्ष केले तर भविष्यात याठिकाणी अनुचित घडण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे.
याच सावकाराकडे पैसे घेण्यासाठी घर, गाडी, दागिने यांसह शेती तारण म्हणून ठेवण्यात येते. जर आपण योग्य वेळेत मुद्दल परतफेड केली नाही तर याच सावकारांकडून या सर्व मालमत्तेवर डल्लासुध्दा मारल्याच्या चर्चा सध्या शृंगारतळी सह गुहागर तालुक्यात सुरू आहे. याबाबत रत्नागिरी मधील सावकारकीची लायसन देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता गुहागर तालुकयात आम्ही कोणालाही २५ टक्के व्याजदराने पैसे देण्याची मुभा दिलेली नाही आहे. आणि जर असे कोणी करत असेल तर संबंधित पीडीत व्यक्तीने आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्या अधिकाऱ्यांनी केले आहे. जर कागदोपत्री दोन टक्के व्याजदराने करार होत असेल आणि प्रत्यक्षात २५ टक्के व्याजदर घेतला जात असेल तर ही गंभीर बाब आहे याबाबत आम्ही चौकशी करू असेही ते म्हणाले.