गुहागर ; राष्ट्रवादीत रंगले आगळेवेगळे ‘कवित्व’ कवी आरेकर यांच्या तालुकाध्यक्षपद निवडीने एकच चर्चा, सहदेव बेटकर गायब, नवे चेहरे आणून ढासळलेल्या तटबंदीची तटकरेंकडून डागडुजी

0
616
बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कवी राजेंद्र आरेकर यांच्या निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारणात आगळेवेगळ्या कवित्वाची चर्चा रंगू लागली आहे. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेल्या रामचंद्र हुमणे गुरुजी यांच्या राजकीय छडीचा धाक संपुष्टात आल्याने एकवर्षापासून पोरके असलेल्या या पदाला एका कवीच्या रुपाने तालुकाध्यक्ष मिळालेला आहे. हे सर्व सध्या तरी ठिकठाक असले तरी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारुन येथून आमदारकीसाठी निवडणूक लढविणारे सहदेव बेटकर मात्र, गायब झालेले पहायला मिळत आहेत. त्यातच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्षपदी निवडीवेळी तेथे उपस्थित असलेले व अनेक पक्षांतून कोलांट्या उड्या मारुन पुन्हा राष्ट्रवादीच्या स्वगृही परतलेले रमेश कदम यावेळी पहायला मिळाल्याने राजकारणातील रंगलेले हे कवित्व कितपत टिकणार असा सवाल जाणकारांनी उपस्थित केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करुन गुहागरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्याबरोबर तालुक्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्यही आपल्याबरोबर आणल्याने येथील राष्ट्रवादी पूर्णतः गलितगात्र झाली होती. अशावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार देताना मोठी दमछाक झाली होती. आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार हा त्यांच्या तोडीस तोडच असावा, हे अचूक हेरुन खासदार सुनील तटकरे यांनी चाचपणी सुरु केली. याचदरम्यान, संगमेश्वरमधील जिल्हापरिषदेतील शिवसेनेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची गुहागर मतदारसंघातील उमेदवारीची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती. त्यांनी समाजाचे राजकारण करुन व बहुजन समाजाला कवटाळून स्वतःच्या हट्ट्पायी अखेर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. साहजिकच खासदार तटकरेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मिळालेला पाठिंबा बेटकर यांच्या कामी आला. असे असले तरी बेटकर यांच्या प्रचाराला राष्ट्रवादीचा एकही नेता गुहागरमध्ये आला नाही की, व एकही प्रचारसभा झाली नाही. अखेर राष्ट्रवादीचे गुहागरमध्ये पानिपत झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांनी तब्बेतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. साहजिकच गेले वर्षभर गुहागरची राष्ट्रवादी पूर्णतः पोरकी झालेली होती. पराभूत झालेले बेटकर पुन्हा गुहागरला फिरकलेच नाहीत. अशा स्थितीत मरगळेल्या पक्षाला गुहागरमध्ये संजीवनी प्राप्त करुन देण्यासाठी खासदार सुनील तटकरे व जिल्ह्याच्या राष्ट्रवादीला एक वर्षाची वाट पहावी लागली, हे दुदैव. गेले 8 महिने कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लाँकडाऊनचे निमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना आयतेच मिळाले होते. अखेर तालुकाध्यक्षपदाच्या निवडीने येथील पक्षाच्या डागडुजीला मुहूर्त सापडला.
दरम्यान, अनेक पक्षांतून आपले नशीब अजमावत आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांची ढकलगाडी अखेर आपल्या मूळच्या राष्ट्रवादी पक्षात एकच महिन्याभरापूर्वी दाखल झाली आहे. यामागेही खासदार तटकरे यांचीच किमया असावी. गुहागर राष्ट्रवादीला तसा अद्याप पालक सापडलेला नाही. आमदार भास्कर जाधव व रमेश कदम यांचे अनादीकालापासूनचे राजकीय हाडवैर सर्वांनाच माहित आहे. गुहागरमध्ये त्यांना तोडीस तोड म्हणून अशा पध्दतीचाच नेता द्यावा लागेल, हे राजकारणात मुसुद्दी व चाणाक्ष असलेल्या खासदार तटकरेंना चांगलेच माहित आहे. त्यामुळे गुहागरचे पालकत्व रमेश कदमांना मिळण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी गुहागरमध्ये राष्ट्रवादीची डागडुजी करणे तेवढे सोपे नाही. कारण गेली 25 वर्षे गुहागरमध्ये सत्ता गाजवलेल्या भाजपला येथे गेल्या 10 वर्षात परिवर्तन करता आलेले नाही. साहजिकच आमदार भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्यासमोर येथे अन्य पक्षांना आपली पाळेमुळे रोवणे अशक्यच असल्याचे सद्यस्थितीवरुन दिसून येत आहे. 10 वर्षांपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे गुहागरचे पालकत्व देताना त्यांना प्रथम विधानपरिषदेची आमदारकी देऊन गुहागरमध्ये राष्ट्रवादीच्या पायाभरणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी ज्यापध्दतीने येथे राजकारण करुन सत्ता मिळविण्यात यश मिळविले ते इतरांसमोर अशक्यच ठरणार आहे.
सध्या तरी गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ढासळलेल्या तटबंदीची पुन्हा डागडुजी करणे सुरु झाले आहे. तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीने हे समोर आले आहे. आजपर्यंत गुहागर राष्ट्रवादीच्या राजकारणात जे दृष्टीआड होते अशा नव्यांना तालुका कार्यकारणीत पुढे आणण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष म्हणून कवी मनाच्या राजेंद्र आरेकर यांना स्थान दिले आहे. अशा नव्या बदल्याने गुहागरमध्ये राष्ट्रवादीला उभारी मिळेल का, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या बऱ्याच महिन्यांच्या गुहागरमधील आगमनाने व नव्या तालुका कार्यकारिणी निवडीने येथील राष्ट्रवादीच्या राजकारणात अनोखे रंग भरण्यात आलेले आहेत, ते कितपत टिकतात हे अभ्यासणे महत्वाचे ठरणे आहे.
गुहागर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदासाठी राजेंद्र आरेकर, विजय मोहिते व दीपक जाधव असे तीघेजण इच्छुक होते. या पदासाठी तिघांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. अशा स्थितीत खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा सरचिटणीस, विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष अशी तीन पदांची नियुक्ती केली. यामध्ये राजेंद्र आरेकर यांची निवड करण्यात आली. आरेकर हे 35 वर्षे एसटी महामंडळाच्या गुहागर आगारामध्ये लेखा शाखाधिकारी म्हणून काम करीत होते. ते कवी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी गुहागरमध्ये साहित्य चळवळ सुरु करुन मराठी साहित्य परिषदेची गुहागरमध्ये शाखा सुरु करण्यात सिंहाचा वाटा आहे. अशा पदाधिकाऱ्याच्या तालुकाध्यक्ष पद निवडीतील कवित्व गुहागरच्या राजकारणात सर्वांनाच अनुभवायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here