बातम्या शेअर करा

साहेब? छे! छे!, सर? छे! छे!, पोलीस खात्यातील बड्या अधिकारी म्हटलं की सर्वसाधारण हे शब्द लागू होतात. पण, का कुणास ठाऊक विशाल गायकवाड सरांना या दोन शब्दांनी हाक मारताना किंवा त्यांच्याबद्दल बोलताना हे केव्हा जाणवलंच नाही. कदाचित मार्गदर्शन किंवा मित्र म्हणून सरांचा लाभलेला सहवास त्यामागे असावा!

रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडली. पण, सरांशी बोलाताना केव्हाच त्याचं दडपण जाणवलं नाही. किंवा त्यांनीही कधी ते जाणवू दिलं नाही. हा त्यांचा मोठेपणा. आज सरांबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे विशाल गायकवाड सरांची झालेली बदली. ‘गायकवाड साहेबांची बदली झाली’ या शब्दांनी जागचा उडालोच. काय? एवढंच तोंडून निघालं. पण, त्यांची बदली त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे याची जाणीव झाली आणि मग सरांच्या अनेक आठवणी, सल्ले डोक्यात घोळू लागल्या. दोन वर्षांपूर्वी सर रत्नागिरीत आले. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकून होतो. कारण, झी24 ताससाठी कोकण ब्यूरो चीफ म्हणू काम करताना, रायगड जिल्ह्यातील दिव्यागार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील दरोडा प्रकरणानं सरांची एक नवी ओळख झाली होती. त्यामुळे असा कर्तव्यदक्ष अधिकारी रत्नागिरीत येतोय म्हटल्यावर मनात उत्सुकता होती. पत्रकार म्हणून भेटताना सरांच्या व्यक्तीमत्वाचे नवे पैलू कळले. काम करण्याची सचोटी ही मनाला भावणारी होती. खरं सांगू पहिल्या भेटीत केवळ एका अधिकाऱ्याला भेटलो. पण, नंतर मात्र कायम मित्रत्वाची वागणूक आणि कायद्याच्या चौकटीत राहून मार्गदर्शकच भेटला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काहींना हे अतिशयोक्ती वाटेल देखील. पण, सरांना भेटलेला प्रत्येक माणूस कदाचित हे सांगेल. शांत, संयमानं प्रश्न हातळणे आणि रिझल्ट देणे ही सरांची खासियत. हे कुणीही नाकारू शकत नाही. सरांकडे प्रश्न घेऊन गेल्यानंतर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य सल्ला मिळणार याची शंभर टक्के खात्री! असो.
सरांच्या कामगिरीची आलेख देखील चढता असाच आणि दखल घेत कौतुक करण्याजोगाच आहे. वसई – पालघर येथे असताना खंडणी बहादरांवर नालासोपारा येथे मोक्का अंतर्गत केलेली कारवाई. नाशिक ग्रामीणमध्ये असताना हाताळलेली विविध आंदोलनं. एवढंच नाही तर कोकणात आल्यानंतर निवडणुकीवेळी हाताळलेली परिस्थिती सर्वसामान्यांच्या ह्ऋदयात स्थान मिळवून गेली. रत्नागिरीमध्ये तिवरे धरणावेळी केलेले रेक्युचं काम असो अथवा कोविडच्या काळात सामान्य जनतेला ई पास मिळण्याकरता केलेली धडपड आणि सांभाळलेली जबाबदारी अशा अनेक गोष्टी सरांबद्दल सांगता, बोलता येतील. सरांची अमरावती येथे झालेली बदली आम्हाला नकोच आहे. पण, कर्तव्य आणि भावना यांची गल्लत करणं योग्य नाही. एक गोष्ट मात्र नक्की सर, जातील त्याठिकाणी आपली कामगिरी उत्तम बजावतील. त्यावेळी ‘कॉलर टाईट’ करत आणि हक्कानं आम्ही सांगू हेच विशाल गायकवाड आमच्या रत्नागिरीत होते. पोलीस दलाला मिळालेला हा हिरा आमच्या रत्नागिरीतून जातोय. पण, आठवणींच्या या पेठाऱ्यात अमाप अशा आठवून देऊन. सर, तुम्हाला पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा! पण, खंत एकच आहे, रत्नागिरी जिल्हावासी ‘विशाल’ ह्ऋदय असलेल्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कायम MISS करतील. सर, तुम्हाला आवडो अथवा न आवडो रत्नागिरीची ग्रामदैवत असलेल्या भैरी बुवाकडे एकच साकडं विशाल गायकवाड हे काही काळानंतर पुन्हा रत्नागिरीमध्ये येऊ दे. कारण, तुमची बदली ही रत्नागिरीकरांना परवडणारी नाही. कारण, केवळ एका पोलीस अधिकारी नाही तर आमचा मार्गदर्शक, अधिकारी रूपी मित्र आमच्यापासून लांब जातोय…सर, पुढील वाटचालीस पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा! आणि हो एक गोष्ट सांगायचीच राहिली तुम्ही रत्नागिरीतून गेलात तरी तुम्हाला त्रास देणार बरं का? तो देखील हक्कानं !

प्रणव पोळेकर,
रत्नागिरी


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here