गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना जिल्ह्यामध्येच १४ दिवस क्वारंटाईन करून ठेवण्याची मागणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे माजी आमदार व उत्तर रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यांनी केली आहे.
कोवीड-19 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणा करता अनेक मोठे निर्णय करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची शतकपूर्ती आज ना उद्या होणार आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणारे नामवंत व अनुभवी डॉक्टर डॉ. मोरे यांचा कोरोनामुळेच मृत्यू झालेला आहे.यावरून रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे गांभीर्य लक्षात येते. जिल्ह्यामध्ये एसटी बाबत अनेक विषय व त्यांचे निर्णय होणे गरजेचे आहे. गौरी- गणपती सणाकरता गणेशभक्त वेगवेगळ्या मार्गाने गावांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबतही निर्णय होणे गरजेचे आहे. असे असताना जिल्ह्यातील मंत्री क्वारंटाईन होण्यासाठी मुंबईत जाऊन राहतात आणि आता पालकमंत्रीपण परत मुंबईला गेले तर अनेक प्रश्न प्रलंबित राहतील.ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी तिवारी यांना मुंबईतच क्वारंटाईन केले त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातच क्वारंटाईन करून ठेवावे म्हणजे जिल्ह्यातील समस्यांची जाण पालकमंत्र्यांना होईल व ते त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून करून घेतील. त्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढणारा संसर्ग कमी होऊन जिल्ह्याचे आरोग्य सुधारेल व अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असे डॉक्टर विनय नातू यांनी सांगितले आहे. व तशा प्रकारची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
Home ताज्या बातम्या रत्नागिरी; जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्र्यांना 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवावे – डॉ.विनय...