खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील कथित प्रदूषणाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या सोनगाव ग्रामस्थांनी आता आरपारच्या लढ्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कारवाईचा मागमूस नसल्याने ग्रामस्थांनी उद्या, दि. २७ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कार्यालयावर संपूर्ण ताकदीने धडक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. हा मोर्चा प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात असून, प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
दि. ७ जुलै रोजी लोटे-परशुराम एमआयडीसीतील ‘ए’ संपातून झालेल्या कथित प्रदूषणामुळे परिसरातील नदी आणि पर्यावरण धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट ‘ए’ संपावर धडक देत एमपीसीबी, एमआयडीसी आणि सीईटीपीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रदूषणाची भीषण वस्तुस्थिती दाखवून दिली होती. यावेळी संबंधित प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती.
मात्र, घटनेला तब्बल १९ दिवस उलटूनही एकाही कारखान्यावर ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने केवळ कागदोपत्री हालचाली करून वेळकाढूपणा केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आता संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
दरम्यान, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले होते. मात्र, त्या नमुन्यांचा अहवाल अद्यापही ग्रामस्थांसमोर सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासन नेमके काय लपवत आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“आम्हाला केवळ आश्वासने नकोत; दोषींवर कठोर कारवाई आणि प्रदूषणमुक्त परिसर हवा. न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” असा ठाम इशारा सोनगाव ग्रामस्थांनी दिला असून, उद्याच्या मोर्चाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
















