बातम्या शेअर करा

रत्नागिरी – शासकीय कामासाठी नागरिकांची अडवणूक करून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ८ लाचखोरीच्या प्रकरणांत ११ जण एसीबीच्या कारवाईत अडकले आहेत. यामध्ये एका खासगी मध्यस्थाचाही समावेश आहे.
महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची संख्या सर्वाधिक असून, या विभागातील ५ प्रकरणांत ६ जणांवर कारवाई करण्यात आली. यात तीन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि एका कोतवालाचा समावेश आहे.
पोलीस प्रशासनाशी संबंधित एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीवर कारवाई झाली. तर सार्वजनिक पाटबंधारे विभागातील एका प्रकरणात कार्यकारी अभियंता आणि लिपिक, तर आरोग्य विभागातील एका प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली.
शासकीय काम कायदेशीर असतानाही ते करून देण्यासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी दबावाला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाच मागणे तसेच लाच देणे, दोन्हीही कायद्याच्या कक्षेत गुन्हा असल्याने नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात सजग भूमिका घेण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
लाचेची मागणी झाल्यास उपलब्ध परिस्थितीनुसार ऑडिओ किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा नोंदवून एसीबीकडे तक्रार करता येते. नागरिकांनी अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, लाचखोरीची माहिती मिळाल्यास तातडीने एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here