बातम्या शेअर करा

नवी मुंबई (वाशी) – रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) अंतर्गत असलेल्या आंबा निर्यात केंद्राला भेट देऊन निर्यात प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती घेतली.या भेटीदरम्यान आंब्याची प्रतवारी, स्वच्छता, पॅकिंग, साठवणूक तसेच परदेशात निर्यात करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या व्हेपर हीट ट्रीटमेंट (VHT) आणि इरॅडिएशन प्रक्रियेची माहिती संबंधित तज्ज्ञांकडून घेण्यात आली. निर्यात करताना आंब्याच्या गुणवत्तेसह कोणते निकष पूर्ण करावे लागतात, याचीही पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेश पाटील आणि त्यांच्या टीमसोबत झालेल्या चर्चेत युरोपियन तसेच आखाती देशांमधील आंब्याची मागणी, निर्यातदारांसमोरील अडचणी, आवश्यक गुणवत्ता निकष आणि शेतकऱ्यांचा माल थेट परदेशी बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या दौऱ्यात कृषी सभापती महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्हे, चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, दापोली कृषी सभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, कृषी विभागाचे अधिकारी अभिजीत गडदे तसेच जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाधिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादनाकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन करण्याचा निर्णय या भेटीत घेण्यात आला. विशेषतः शेतकऱ्यांना मँगोनेट नोंदणीसाठी प्रोत्साहित करून निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.यावेळी महेश नाटेकर यांनी सांगितले की, वाशी येथील आंबा निर्यात केंद्राची कार्यप्रणाली आणि निर्यातीसाठीच्या आधुनिक सुविधा पाहता रत्नागिरीतील शेतकऱ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जिल्ह्यात निर्यातक्षम आंबा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मँगोनेट नोंदणीसाठीही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उद्युक्त करण्यात येणार असून, यामुळे रत्नागिरीचा आंबा थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटीमुळे रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना निर्यातीच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले असून, आगामी आंबा हंगामात जिल्ह्यातून आंबा निर्यातीला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here