चिपळूण – कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुंभार्ली घाटात रात्रीच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली आहे. घाटातील एका अवघड वळणावर ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.
ट्रक रस्त्याच्या वळणावरच बंद पडल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे अवघड झाले आहे. परिणामी घाटमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद असल्याने कुंभार्ली घाटावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण आहे. अशा परिस्थितीत कुंभार्ली घाटातच ट्रक बंद पडल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. रात्रीची वेळ असल्याने अडकलेल्या वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय वाढली असून, सकाळपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद पडलेला ट्रक तातडीने हटविणे आणि घाटातील वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
















