पुण्यात डीजेवरून वातावरण तापले; नागपुरात डीजे-लेझरला पूर्ण बंदी, मग रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाची भूमिका काय?

0
1
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – (विशेष प्रतिनिधी ) – गणेशोत्सव म्हटला की ढोल-ताशे, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि भक्तिमय वातावरण अशी कोकणची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांत पारंपरिक उत्सवाला डीजे आणि लेझर शोची जोड मिळाल्याने गणेशोत्सवाच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा पुण्यात डीजे बंदीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच नागपूरमध्ये गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि लेझर शोवर पूर्णतः बंदी घालण्यात आल्याने आता रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन काय भूमिका घेणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गणेशोत्सवात मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना त्रास होतो. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाज सुरू राहत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच गेल्या काही काळात गणेश मंडळांच्या मिरवणुकीत लेझर शोचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लेझरचा थेट प्रकाश डोळ्यांवर पडल्यास दृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नेत्रतज्ज्ञांकडून वेळोवेळी सांगितले जाते. त्यामुळे डीजेसोबतच लेझर शोच्या वापराबाबतही प्रशासनाने स्पष्ट आणि कठोर नियम करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोकणातील गणेशोत्सवाची स्वतःची वेगळी परंपरा आहे. ढोल-ताशे, झांज, टाळ-मृदंग, भजन-कीर्तन आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये आजही जपली जाते. त्यामुळे गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.मात्र काही ठिकाणी राजकीय दबाव, प्रतिष्ठा आणि मंडळांमधील स्पर्धेमुळे डीजेचा आवाज वाढत चालल्याची चर्चा आहे. मोठा डीजे, मोठ्या आवाजाचे स्पीकर आणि लेझर शो म्हणजेच उत्सवाची प्रतिष्ठा, अशी मानसिकता काही मंडळांमध्ये निर्माण झाल्याने पारंपरिक उत्सव मागे पडत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
डीजे आणि लेझरच्या वापराबाबत नियम असतानाही काही ठिकाणी त्याची सर्रास अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदावर नियम न करता सर्वांसाठी समान नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः राजकीय नेत्यांच्या किंवा प्रभावशाली व्यक्तींच्या मंडळांना नियमांमधून सूट मिळणार नाही ना, याकडेही नागरिकांचे लक्ष आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तरच प्रशासनाच्या कारवाईवर नागरिकांचा विश्वास राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालेला असताना आणि नागपूरमध्ये डीजे-लेझरवर बंदीचा निर्णय चर्चेत असताना आता कोकणातील जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे गणेशभक्त आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कमी करण्याचा प्रश्न नाही; मात्र उत्सव साजरा करताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि सुरक्षिततेचा विचार व्हावा, एवढीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून डीजे, ध्वनिप्रदूषण आणि लेझर शोबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि कठोर अंमलबजावणी केली जाणार का? याकडे आता संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे. गणरायाच्या आगमनाचा जल्लोष हवा; पण त्यासाठी दुसऱ्यांच्या कानांचा आणि डोळ्यांचा बळी नको, अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here