बातम्या शेअर करा

रत्नागिरी – मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल आठ जणांना नवजीवन मिळू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश देत रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने गुरुवारी शहरात भव्य ‘अवयवदान जनजागृती रॅली’ काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले.
राज्य शासनाच्या ‘अंगदान (अवयवदान) जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत ३ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा रुग्णालयातून सुरू झालेली रॅली आठवडाबाजार मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. यावेळी अवयवदानाविषयीचे संदेश देणारे फलक, घोषणाबाजी आणि जनजागृतीपर उपक्रमांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे आणि एनसीडी विभागाचे प्रमुख डॉ. उत्तमराव कांबळे यांनी अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करत त्याचे सामाजिक आणि वैद्यकीय महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेत समाजापुढे प्रेरणादायी संदेश दिला.या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुण शिरसाट, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुनिल डोकळे यांच्यासह जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाने अधिकाधिक नागरिकांनी तसेच खाजगी रुग्णालयांनीही अवयवदानासाठी नोंदणी करून या जीवनदायी चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले असून या अभियानामुळे जिल्ह्यात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here