चिपळूण – शिधावाटपातील कथित अनियमिततेबाबत गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत मार्गताम्हाणे येथील सिताराम लक्ष्मण घाणेकर यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिल्याने तहसील कार्यालयातील कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.
घाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, १० मार्च २०२५ रोजी शिधावाटपासंदर्भात प्रथम अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा करूनही संबंधित प्रकरणावर निर्णय झाला नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, पाच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही त्या आदेशांची अंमलबजावणी झालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
“जिल्हा स्तरावरील आदेशांनाही स्थानिक प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाने न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची?” असा सवाल घाणेकर यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. येत्या १५ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास तहसीलदारांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहाराच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत. दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी संबंधित अर्जाची चौकशी पूर्ण झाली असून घाणेकर यांना त्याबाबत सविस्तर लेखी उत्तर देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दाव्यांमध्ये विसंगती दिसून येत असून आता जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.















