चिपळूण – चिपळूण शहरातील रिलायन्स स्मार्ट बाजारासमोरील प्रमुख मार्गावर शुक्रवारी दुपारी एक मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा अडकल्याने वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला. अवघ्या काही मिनिटांत दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते नगरपालिका परिसरापर्यंतचा मार्ग अक्षरशः ठप्प झाला.
वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शालेय विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक दुचाकी व चारचाकी चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला, मात्र त्याठिकाणीही वाहतुकीचा ताण वाढल्याचे चित्र दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर सुरक्षितपणे बाजूला करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने वाहतूक सुरळीत होण्यास बराच वेळ लागला.
या घटनेनंतर शहरातील मुख्य मार्गांवर अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. वर्दळीच्या वेळेत अशा वाहनांना शहरात प्रवेश देण्यापूर्वी ठोस नियोजन करावे, अन्यथा भविष्यात आणखी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.
“एका कंटेनरमुळे शहराचा वेग ठप्प!”
शहराच्या मध्यवर्ती भागातील या घटनेने वाहतूक व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.















