गुहागर – शिक्षणाचा हक्क कायद्यात सुरक्षित व दर्जेदार शिक्षणाची हमी दिली जाते; मात्र गुहागर तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची अवस्था पाहता ही हमी केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळेच्या वर्गखोल्यांची छपरे मोडकळीस आली असताना प्रशासन मात्र केवळ आश्वासनांवरच वेळ काढत असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांनी केला आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेतील चारपैकी सर्व वर्गखोल्या धोकादायक झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर गाव विकास कमिटी व ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करून दोन वर्गखोल्यांची तात्पुरती दुरुस्ती केली आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गाडा कसाबसा सुरू ठेवला. मात्र उर्वरित दोन वर्गखोल्या आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असतानाही सात वर्गांचे अध्यापन केवळ दोन वर्गखोल्यांमध्ये करण्याची वेळ शाळेवर आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा खालावत असून त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला. निवेदने देण्यात आली, मागण्या करण्यात आल्या; मात्र प्रशासनाच्या फाईली पुढे सरकल्या नाहीत. त्यामुळे संतप्त पालकांनी आता थेट आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा दिला आहे. गाव विकास कमिटीने पंचायत समितीच्या सभापतींकडे निवेदन सादर करून उर्वरित वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीला तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कागदी प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. शाळांच्या गुणवत्तेच्या आणि शिक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या यंत्रणांसाठी वाकी शाळेची अवस्था ही लाजिरवाणी बाब ठरत असून, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.














