रत्नागिरी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत कोळंबे येथे वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ग्रामपंचायत कोळंबे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोळंबे आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात RHWE गटातील विद्यार्थ्यांच्या प्रस्तावनेने झाली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, हवामान बदलाची आव्हाने आणि वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक शेती पद्धती व कृषी क्षेत्रातील विविध संधींबाबत ग्रामस्थांना उपयुक्त माहिती देण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैली, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांविषयी माहिती दिली. कार्यक्रमात ग्रामपंचायत परिसर तसेच ग्रामदेवता मंदिर परिसरात पर्यावरणपूरक व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याशिवाय ग्रामस्थांना विविध प्रकारच्या वृक्षांचे मोफत वाटप करून “एक कुटुंब – एक वृक्ष” हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक प्रशांत पाटील, ग्रामविकास अधिकारी जानवी शिंदे, महसूल अधिकारी सुषमा आवळे, सदस्य साधना नागवेकर, डॉ. सूर्यवंशी, त्रिमुखी देवस्थानचे अध्यक्ष दिवाकर पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अजित हातिसकर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

















