रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवत ८ आरोपींना अटक केली आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये गावठी कट्ट्यासह ७ बंदुका आणि २९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभरातील संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी एकूण ५ गुन्हे उघडकीस आणत ८ जणांना जेरबंद केले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ सिंगल बॅरल काडतुसी बंदुका, १ ठासणीची बंदूक, १ गावठी कट्टा आणि २९ जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख २८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या समन्वयाने विविध पोलीस पथकांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, त्यांची खरेदी-विक्री करणारे किंवा वापरणारे यांच्याविरुद्ध भविष्यात आणखी कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
















