बातम्या शेअर करा


गुहागर – गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असताना रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मंगळवारी गोपाळगड किल्ल्याला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला नाही, तर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होत गड संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.
गेल्या काही दिवसांत पर्यटक आणि आतील जमिनीच्या मालकांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर किल्ल्याच्या मालकी हक्काचा मुद्दा चर्चेत आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेल्या चार दिवसांपासून किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बगाटे यांनी प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, गोपाळगड हा पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील ऐतिहासिक किल्ला असून आतील काही जमीन खाजगी मालकीची आहे. मात्र त्या जागेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी सर्व नागरिकांना प्रवेश आहे. अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. या भेटीदरम्यान बगाटे यांनी संबंधित जागा मालकांचीही भेट घेतली. अधिग्रहण प्रक्रियेबाबत त्यांनाही माहिती असल्याने सध्या कोणताही मोठा वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे गोपाळगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी स्वतः झाडू हातात घेत गडातील धान्य गोदाम परिसराची स्वच्छता केली. त्यांच्या पुढाकारामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारीही उत्साहाने मोहिमेत सहभागी झाले.
“गडांचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्वच्छतेतूनच संवर्धनाचा पाया मजबूत होतो,” असा संदेश यावेळी बगाटे यांनी दिला.या मोहिमेत गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यासह रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील आणि गुहागर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here