गुहागर – गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील शिवकालीन गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गोपाळगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असूनही काही तांत्रिक त्रुटींमुळे त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर स्थानिक रहिवाशांच्या नावाने झालेली आहे. संबंधित क्षेत्रात काही स्थानिकांची वहिवाट तसेच आंबा बागायती असल्याने मालकी हक्काचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गोपाळगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक असूनही काही तांत्रिक त्रुटींमुळे त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर स्थानिक रहिवाशांच्या नावाने झालेली आहे. संबंधित क्षेत्रात काही स्थानिकांची वहिवाट तसेच आंबा बागायती असल्याने मालकी हक्काचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रसारमाध्यमे किल्ल्याची खाजगी मालकी हटवून तो शासनाच्या ताब्यात देण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. यासंदर्भातील बहुतांश कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात असून, आता पुरातत्त्व विभाग आणि महसूल विभागाकडून अंतिम टप्प्यातील कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्ष ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, सातबाराच्या इतर अधिकारांमध्ये गोपाळगडाची नोंद “राज्य संरक्षित स्मारक” म्हणून करण्यात आलेली आहे. तथापि, मुख्य मालकी हक्काच्या नोंदीमध्ये अजूनही खाजगी व्यक्तींची नावे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेला गोपाळगड किल्ला खाजगी मालकी व वहिवाटीतून मुक्त करून तो पूर्णपणे शासनाच्या नावावर नोंदवावा तसेच पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
















