बातम्या शेअर करा


गुहागर – गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काही वर्षांपूर्वी हा किल्ला अवघ्या तीनशे रुपयांत विक्री झाल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी तसेच शिवतेज फाउंडेशन यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. हा ऐतिहासिक वारसा शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती.
यानंतर २०२५ मध्ये राज्य शासनाने गोपाळगड आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे हा वाद संपल्याचे मानले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. नुकतेच काही पर्यटक गोपाळगड पाहण्यासाठी गेले असता, “हा किल्ला शासनाचा नसून आमच्या खासगी मालकीचा आहे. सातबारावर आमची नावे आहेत,” असा दावा काही व्यक्तींनी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, शासनाने खरोखरच किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता का? की केवळ प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले होते? तसेच आजही किल्ल्याच्या सातबारावर खासगी व्यक्तींची नावे कायम आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
इतिहासाचा महत्त्वाचा वारसा असलेल्या गोपाळगडाच्या मालकीबाबत आता प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत असून, स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये पुन्हा संतापाची भावना निर्माण झाली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here