दापोली – पत्नी गेल्याचा विरह असह्य; अवघ्या दोन तासांत पतीचाही मृत्यू वृद्ध दाम्पत्याच्या अतूट प्रेमाने गावकऱ्यांचे डोळे पाणावले

0
275
बातम्या शेअर करा


दापोली -काही नाती ही केवळ संसारापुरती मर्यादित नसतात, ती श्वासागणिक जगली जातात आणि शेवटच्या क्षणापर्यंत साथ निभावतात. दापोली तालुक्यातील बुरोंडी महामाई नगर येथे अशाच एका वृद्ध दाम्पत्याने मृत्यूच्या दारातही एकमेकांची साथ न सोडता प्रेमाची अनोखी कहाणी लिहून ठेवली. पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या दोन तासांत पतीनेही प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
गोविंद बाळाजी साठे (वय ९६) आणि लक्ष्मी गोविंद साठे (वय ९०) या दाम्पत्याचे २२ मे रोजी एकाच दिवशी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बुरोंडी परिसर शोकसागरात बुडाला असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले आहेत.अनेक दशकांचा संसार, सुख-दुःखाच्या असंख्य वाटा आणि एकमेकांवरील निस्सीम प्रेम यामुळे साठे दाम्पत्य गावात आदर्श मानले जात होते. गोविंद साठे हे मनमिळाऊ, कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाचे होते, तर लक्ष्मी साठे यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी वाहिले होते. दोघांचे नाते इतके घट्ट होते की, एकाशिवाय दुसऱ्याचा दिवसही पूर्ण होत नव्हता.
२२ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मी साठे यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच गोविंदराव पूर्णपणे खचून गेले. आयुष्यभर सावलीसारखी सोबत करणारी जीवनसाथी कायमची दूर गेल्याची वेदना त्यांच्या मनाला असह्य झाली. पत्नीच्या आठवणीत हरवलेल्या गोविंदरावांनीही अवघ्या दोन तासांत, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या जगाचा निरोप घेतला.
एकाच घरातून दोन अर्थी बाहेर पडताना संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. अनेक वर्षं ज्या घरात त्यांच्या हसण्याचे, प्रेमाचे आणि आपुलकीचे स्वर घुमत होते, त्या घरात एकाच वेळी दोघांचे पार्थिव पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मात्र, आयुष्यभर हातात हात घालून चालणाऱ्या या दाम्पत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ न सोडता “जगलोही एकत्र आणि गेलोही एकत्र” हे शब्द खरे करून दाखवले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here