साखरपा – आंबा घाट येथे एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने आज बुधवारी रात्री १० नंतर आंबा घाट मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जयगडहून कोल्हापूरकडे निघालेला एलपीजी टँकर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घाटात पलटी झाला. या भीषण अपघातात चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याची प्रक्रिया आज रात्री हाती घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रात्री १० नंतर घाटमार्ग पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणाकडे जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात येणार असून, कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गगनबावडा आणि पाटण मार्ग सुचवण्यात आले आहेत. या घटनेमुळे आंबा घाट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
















