गुहागर – गुहागर तालुक्यातील विसापूर-पांगरी मुख्य रस्ता मुसळधार पावसाच्या तडाख्याने अक्षरशः खचला असून या घटनेमुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठी भेग पडून मोठा भाग खचल्याने वाहनांची ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच अशा प्रकारे रस्ता खचल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या पायाभूत संरचनेलाच मोठा फटका बसला आहे. रस्ता धोकादायक झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच एसटी बससेवाही ठप्प झाली असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. या मार्गावरून दररोज शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या पांगरी, विसापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना लांबच्या पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत असून काहींना जीव धोक्यात घालून पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पालकांमध्येही मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
रस्ता खचल्यामुळे रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा आणि दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी केली आहे.
“रस्ता खचल्याने आमचा गावाशी संपर्कच तुटला आहे. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रुग्ण यांचे हाल सुरू आहेत. प्रशासनाने केवळ पाहणी न करता तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरू करावी,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले असून हा महत्त्वाचा मार्ग नेमका कधी सुरू होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
















