चिपळूण – चिपळूण तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध नळपाणीपुरवठा योजनांमध्ये मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही अनेक योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याचा मुद्दा संदीप शिवानी सावंत यांनी मांडला त्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा गाजला.
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे, वहाळ, निवळी, कळंबट, केरे आणि पिलवली तर्फे सावर्डे या गावांतील जलजीवन मिशनच्या योजना गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, प्रत्यक्षात कामे पूर्ण नसतानाही मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासन निधीचा अपव्यय झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू झाली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत शिवानी संदीप सावंत यांनी या सर्व योजनांची सखोल चौकशी करण्याचा ठराव मांडत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यापूर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा भारती-पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत योजनांची पाहणी केली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुर्तवडे सुतारवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ५१ लाख २१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ४० लाख ७९ हजार रुपये वितरित झाले आहेत. तरीही विहिरीचे काम अपूर्ण आहे. विहिरीसाठी खोदण्यात आलेला खड्डा धोकादायक ठरत असल्याने तो बुजवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या पाणीटाकीचे प्लास्टरही पूर्ण नसताना पाणी कनेक्शन जोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, ग्रामस्थांना नदीतील चिखलयुक्त पाणी वापरण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. वहाळ येथील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या योजनेपैकी ९७ लाख ६७ हजार रुपये खर्च झाले असूनही कामे अपूर्ण आहेत. निवळी येथील १ कोटी ३१ लाख रुपयांच्या योजनेत १ कोटी ६६ हजार रुपये अदा करण्यात आले असतानाही कामे रखडलेलीच आहेत. कळंबट येथील १ कोटी ३८ लाख ९५ हजार रुपयांच्या योजनेत १ कोटी १६ लाख ६५ हजार रुपये खर्चूनही योजना पूर्णत्वास गेलेली नाही.
केरे गावच्या ६९ लाख ४६ हजार रुपयांच्या योजनेत ४१ लाख रुपये वितरित झाले आहेत, तर पिलवली तर्फे सावर्डे येथील तब्बल २ कोटी ४१ लाख रुपयांच्या योजनेत ९२ लाख रुपये खर्चूनही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. रखडलेल्या योजनांमुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप वाढत आहे. आता जलजीवन मिशनच्या कामांमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण चिपळूण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
















