रत्नागिरीत ११ किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

0
252
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय येथे आणखी एक जीव वाचवणारी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. ७० वर्षीय सुरेखा गणपत लोंढे यांच्या बीजाशयातून तब्बल ११ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले असून, या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मोफत आणि अत्याधुनिक उपचार मिळत असून, त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या घटनेतून आला आहे.
सुरेखा गणपत लोंढे यांना उलट्या होणे, तीव्र पोटदुखी तसेच सतत अशक्तपणा जाणवत असल्याने त्या रुग्णालयाच्या ओपीडी विभागात दाखल झाल्या होत्या. त्यांची सखोल तपासणी सर्जन डॉ. आदेश पाल्येकर यांनी केली असता बीजाशयामध्ये मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निदान झाले. त्यानंतर रक्त तपासणी, सोनोग्राफी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
वैद्यकीय अहवालांचा अभ्यास करून तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सर्जन डॉ. आदेश पाल्येकर आणि ॲनेस्थेटिस्ट डॉ. जमशीर यांच्या उपस्थितीत ही अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे, रुग्णाच्या शरीरातील अंदाजे ११ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. या यशस्वी उपचारानंतर रुग्णांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक व मोफत आरोग्यसेवा देण्याचा संकल्प जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सातत्याने पूर्ण करत असून, या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे सांबरे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here