चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ; मार्च २०२६ अखेर ४२ कोटी ७५ लाख व्यवसायिक नफा व २३११ कोटींचा व्यवसाय

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ३२ वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या अढळ विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहत उल्लेखनीय आणि दिमाखदार प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रातील भरीव आणि उत्कृष्ट योगदानाची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना मिळालेला आदर्श जीवन गौरव पुरस्कार आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिला अधिकारी म्हणून पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेला बेस्ट सीईओ पुरस्कार हे संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीचे ठळक प्रतिक ठरले आहेत. मार्च २०२६ अखेर संस्थेला ४२ कोटी ७५ लाख व्यवसायिक नफा झाला असून, संस्थेने २३११ कोटींच्या व्यवसायाचा टप्पाही पूर्ण केला आहे. प्रत्येक वर्षागणिक संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत चालला आहे, ही बाब सर्वसामान्य ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक आणि विश्वासार्ह असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या १ लाख ४६ हजार ६८२ इतकी असून भाग भांडवल ८४ कोटी तर एकूण स्वनिधी १८२ कोटी इतके आहे. केवळ ३२ वर्षाच्या कालखंडात सभासदसंख्या, भाग भांडवल व स्वनिधी या तिन्ही क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ साधत राज्यातील निवडक अग्रगण्य संस्थांमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या ठेवी १२४५ कोटी असून एकूण कर्जव्यवहार १०६६ कोटी आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २३११ कोटीचा असून तो या वर्षात २५०० कोटींच्या टप्यापर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट संस्थेने निश्चित केले आहे. या संस्थेच्या आर्थिक सक्षमतेचा पाया अत्यंत भक्कम असून, संस्थेचे एकूण स्वनिधी १८२ कोटी इतके आहे. आर्थिक बळकटीसह सामाजिक बांधिलकी जपण्यातही संस्थेला लक्षणीय यश प्राप्त झाले आहे. सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याची धोरणात्मक भूमिका संस्थेने कायम ठेवली आहे. गेली २७ वर्षे संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलावर १५ टक्के डिव्हिडंड सातत्याने देत आहे. आर्थिक सक्षमते बरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदांना त्यांच्या भविष्याची स्वप्ने साकार करण्यासाठी १ वर्षापासून १० वर्षापर्यंत कालावधीच्या एकूण अकरा (११) आवर्तक ठेव योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आल्या असून, या योजनांचे ५४०००हून अधिक खातेदार आहेत. दरमहा साधारण ६ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम त्यांच्या आवर्ती ठेव खात्यांमध्ये जमा होत आहे. समाजातील सर्वच घटकांचा विचार करणा-या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने गृहिणींनाही बचतीचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी “सुकन्या ठेव” व “गृहलक्ष्मी ठेव” या नव्या योजना सुरू करण्यात आल्या. तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह निमित्त ५ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि चिपळूण नागरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५. जुन २०२५ रोजी “एक पेड माँ के नाम” हा शासनाचा स्तुत्य उपक्रम राबिवला.

संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध मान्यवरांनी वेळोवेळी भेट देत संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब, रेल्वे मंत्री मा. सुरेश प्रभू साहेब, रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री व मराठी भाषा व उद्योग मंत्री श्री. उदय सामंत साहेब, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. नारायणराव राणे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीणजी दरेकर साहेब, कोकण पदवीधर विधान परीषद आमदार श्री. निरंजन डावखरे साहेब, राजापुर विधानसभा आमदार किरण सामंत, महाड विधानसभा आमदार भरत गोगावले साहेब यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करुन कौतुकाची थाप दिली आहे. सन २०२३-२०२४ या कालावधीत उत्कृष्ट कामकाज करणारी सहकारी पतसंस्था म्हणून दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी “कोकण पतसंस्था भूषण” पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. देशपातळीवरील नामांकित वृत्तपत्र समूह असलेल्या नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्रसमूहातर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांना ५ एप्रिल २०२६ रोजी “आदर्श जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबईतर्फे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना ३ एप्रिल २०२६ रोजी “बेस्ट सीईओ” पुरस्काराने गौरविण्यात आले. या गौरवांनी संस्थेच्या शिरपेचात मानाचे नवे तुरे खोवले गेले आहेत. सहकाराच्या मुळ उद्देशा प्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी “सहकार समृध्दी” हा महत्त्वकांक्षी संकल्पपूर्ती आराखडा तयार करण्यात आला असुन तो यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा, सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणा-या असंख्य कार्यकार्त्यांचा मोलाचा सहभाग मिळत असुन आपले नियोजीत उद्दिष्ट पुर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिध्द करु. “आपली माणसे आपली संस्था” हे ब्रीद वाक्य ख-या अर्थाने सिध्द करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here