गुहागर – गुहागर एसटी आगारातील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गुहागर आगार प्रशासनाने नवीन बस फेऱ्यांचे नियोजन केले असले, तरी या फेऱ्यांसाठी आवश्यक त्या नवीन बसेस किंवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आधीच बसची कमतरता आणि कर्मचाऱ्यांवरील ताण असताना नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्याने विद्यमान यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. यामुळे बससेवेची गुणवत्ता आणि वेळापत्रकावर परिणाम होत असल्याची तक्रार प्रवासी व कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिलेला लेखी संदेश. या संदेशामध्ये “आगारातून जी गाडी मिळेल ती कोणतीही असो, तिची स्थिती कशीही असो, कोणतीही विचारणा न करता ती गाडी घेऊन जाणे” असे निर्देश देण्यात आल्याचा आरोप आहे.
कर्मचाऱ्यांच्या मते, हा प्रकार दबाव टाकणारा असून कामगारांच्या सुरक्षिततेसह प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारा आहे. अनेक गाड्या न धुतलेल्या, जुन्या, वारंवार बिघाड होणाऱ्या तसेच स्पीड लॉक असलेल्या अवस्थेत रस्त्यावर पाठवल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, “अशा प्रकारे लेखी स्वरूपात धमकी देणारा आदेश देणारा अधिकारी नेमका कोण?” असा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशीची मागणी जोर धरत आहे.स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातूनही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत असून, तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सुरक्षित आणि सुरळीत बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे गुहागर आगाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी आगारप्रमुख पद रिक्त असल्याने कोणताही स्वयंघोषित कर्मचारी हे आगार चालवतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी आगारप्रमुख द्यावेत व अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना धमकी वजा मेसेज देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्याचेच आहे.
















