शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथून जानवळेच्या दिशेने वाहणाऱ्या त्या नदीमध्ये नेहमी दूषित पाणी कसे येते? कुठून येते? याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय. सामाजिक कार्यकर्ते मयूर भोसले यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
शृंगारतळी जानवळे दरम्याने एक नदी वाहते या नदीत नेहमीच मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी सोडले जात असल्याची तक्रार येथील नागरिक प्रसाद जावकर व जानवळे येथील ग्रामस्थ करत असत. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते याचवेळी या नदी शेजारी असणाऱ्या विहिरीमधील पाणी दूषित असल्याचा रिपोर्ट सुद्धा आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आला तर याच नदीच्या शेजारी राहणाऱ्या काही ग्रामस्थांना उलटी जुलाब यासारखे आजारी होऊ लागले याला कंटाळून या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी हे दूषित पाणी नक्की येते? कुठून याचा तपास करण्यास सुरुवात केली. आणि रात्री बारा वाजता हा तपास पूर्ण झाला हेमंत रेस्टॉरंट आणि बार यांच्या हॉटेल समोर असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्धीकरण न करता हे दूषित पाणी सोडले जात असल्याचे मयूर भोसले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत या घटनेचा व्हिडिओ केला आणि हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. हा गंभीर प्रकार उघड होऊन दोन दिवस होत आले तरी अद्यापही येथील ग्रामपंचायतीने किंवा आरोग्य विभागाने हॉटेल हेमंत रेस्टॉरंट आणि बार यांना अद्याप याबाबत कोणतीही विचारणा केली नसल्याचे खंत मयूर भोसले यांनी व्यक्त केली. आमच्या गावातील नदीमध्ये दूषित पाणी सोडणाऱ्या या हॉटेल हेमंत वर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. आता आमच्या नदीत नक्की दूषित पाणी कोण सोडते हे आम्ही प्रशासनाला व्हिडिओसह दाखवून दिले असताना सुद्धा प्रशासन या हेमंत हॉटेलवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न जाणवळे गावातील नागरिकांसह मयूर भोसले यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराबाबत हेमंत हॉटेलचे मालक ओंकार संसारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आलेली नाही.
















