आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान

0
25
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेला गेली अनेक वर्षे प्रगतीपथावर नेणारे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय श्री. सुभाषराव चव्हाण यांना ‘नवभारत–नवराष्ट्र समूहातर्फे आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सहकार, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुभाषराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजाची छाप उमटवली. सेवेत असतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि लोकहिताचा विचार डोळ्यासमोर ठेवून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या पतसंस्थेला केवळ चिपळूणपुरते मर्यादित न ठेवता कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत नावारूपाला आणले. पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तसेच अनेक युवक-युवतींना स्वावलंबी होण्यासाठी दिशा आणि बळ दिले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे, गरजूंना आधार देणारे आणि सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

महापूर आणि कोरोना काळात सुभाषराव चव्हाण यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक उपक्रम, जनहिताचे निर्णय आणि लोककेंद्री कामामुळे त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि अनेकांना दिलेला आधार याचा सर्वांगीण विचार करून त्यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here