संगमेश्वर – महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कोळंबे ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात आधुनिक, शाश्वत आणि उत्पादनक्षम शेतीचा संदेश देत शेतकऱ्यांना विविध कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली “डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ”,”दापोली” अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या RHWE कृषी मित्र ग्रुप, कोळंबे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यार्थी जय इंगळे यांनी केली. त्यानंतर नंदकुमार सातपुते व शुभम आग्रे यांनी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फळझाडे व पालेभाज्यांच्या संकरित वाणांची माहिती देत त्यांचे फायदे शेतकऱ्यांसमोर उलगडले. श्रेयस गुरव यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि नैसर्गिक शेतीचे लाभ याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ऋषिकेश सलगर यांनी ‘लखीबाग मॉडेल’ची सविस्तर माहिती देत कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याच्या आधुनिक संकल्पनेची माहिती शेतकऱ्यांना दिली. या मॉडेलमुळे शेती अधिक फायदेशीर व शाश्वत होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे कोळंबे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नारळाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासह फळबाग लागवडीला चालना देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक प्रशांत पाटील, उपसरपंच रविंद भातडे, ग्रामविकास अधिकारी जानवी शिंदे, माजी उपसरपंच हेमंत पवार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अजित हातिसकर, प्रगतशील शेतकरी प्रशांत फडणीस, RHWE कृषी मित्र ग्रुपचे विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
















