खेड – रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सततच्या पावसामुळे जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली असून आज सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोकापातळी ७.०० मीटर असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. तसेच खेड-खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही जलमय झाल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे तसेच परिस्थिती गंभीर झाल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
















