रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी भागातच जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपाची तीव्रता कमी असली तरी काही भागांतील नागरिकांना जमिनीला सौम्य कंप जाणवल्याने ते घराबाहेर आले होते. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.















