गुहागर– गुहागर तालुक्यातील शृंगारतळी-गुहागर मार्गालगत स्मशानभूमीनजीक एका परप्रांतिय व्यवसायिकाचे बिनशेती नसलेल्या जमिनीत कमर्शियल बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे त्या जमिनीला लागूनच परंपरागत नाला असून तो आड येत असल्याने त्याचा मूळ नैसर्गिक प्रवाह बदलून संरक्षक भिंतीचे काम केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील नाल्याचे पाणी इतरत्र पसरण्याची शक्यता आहे. याकडे गुहागर महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून या बांधकामाला नेमका आर्शिवाद कुणाचा असा सवाल उपस्थित होत आहे.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी आहे. येथे अलिकडे मोठ्या प्रमाणात बांधकामे वाढू लागली आहेत. काही अनधिकृत बांधकामेही डोके वर काढताना दिसतात. मात्र, स्थानिक प्रशासनासह संबंधित विभाग कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. काही व्यवसायिकांकडून पाणथळ जागाही सोडल्या जात नाहीत. विशेष करुन परप्रांतिय व्यवसायिक, व्यापारी यांच्याकडून शृंगारतळी परिसरात स्थानिक दलालांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या जात आहेत. साहजिकच स्थानिक प्रशासन, जमिनी विक्री करणारे स्थानिक जमिनदार यांना याचे काहीही सोयरसुतक नसते.
शृंगारतळी बाजारपेठेत 30 लाखाची चोरी.? गुहागर पोलिसांना चोरांचे नवे आव्हान..
शृंगारतळी महामार्गालगत स्मशानभूमीच्या कडेला एका परप्रांतिय व्यवसायिकाने स्थानिक जमिनदाराकडून नुकतीच जमीन खरेदी केली होती. याच जमिनीत या व्यवसायिकाने बांधकाम सुरु केले आहे. या जमिनीच्या कडेने एक परंपरागत मोठा नाला गेलेला आहे. हा नाला अनेकांच्या शेत जमिनीच्या कडेने आलेला आहे. मूळ नैसर्गिक प्रवाह असल्याने विशेष करुन पावसाळ्यात या नाल्याला मोठे पाणी येते. मुळातच ही जागा पाणथळ असून महामार्ग उंचीवर तर आणि तेथील जमिनीही सखल भागात आहेत. त्यामुळे नाला आणि पाणी एक होते. परिणामी, स्थानिकांना याचा मोठा फटका बसतो.
संबंधित व्यवसायिकाच्या जमिनीच्या कडेने हा नाला गेला असून त्याने या नाल्याचा मूळ नैसर्गिक प्रवाह बदलून स्वतःच्या मनाने जणूकाही इंजिनियर असल्याच्या आर्विभावात संरक्षक भिंत बांधायला घेतली आहे. सध्या वाळू बंद आहे. असे असताना संरक्षक भिंतीच्या बांधकामाला वाळू येते कुठून असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ही जमीन बिनशेती नसतानासुध्दा महसूल विभागाच्या नियमांना बगल देऊन येथे अवैध बांधकाम केले जात आहे. शृंगारतळी-गुहागर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्यांना हे बांधकाम दिसत नाही का, की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, नाल्याच्या कडेने संरक्षक भिंत घालताना तेथे महावितरणचे दोन मोठे वीज खांब आहेत. या खांबालगतच खोदकाम करुन बांधकाम केले जात आहे.
.