..मग रस्ते अपघातात आपण बघ्याची भुमिका का घेतो?

0
238
बातम्या शेअर करा

रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी देवमाशाचे पिल्लु आले होते त्याला वाचवण्यासाठी खुप लोकांनी धडपड केली पण दुर्दैवाने त्याचा मृत्यु झाला. दोन दिवस जी समुद्रातील एका सस्तन प्राण्याला तिथल्या स्थानिकांनी, विविध सामाजिक संस्थांनी, प्रशासनाने व ज्ञात अज्ञात लोकांनी त्या पिल्लाला जगवण्यासाठी धडपड केली ते पाहता मानवी मनात संवेदना जागृत असल्याचे जाणवले. एका माशासाठी एवढं सारं लोकं करीत होते केवढी ती भूतदया. सोशल मिडियातही हा देवमासा जीवंत रहावा म्हणुन लोकं प्रार्थना करीत होती.माणसं संवेदनशील आहेत असे या निमित्ताने दिसलं. आपण सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत इतकं संवेदनशील असायला हवं .

आपल्याकडे रस्ते अपघात खुप होतात. रस्त्यांची विशिष्ठ परिस्थितीमुळे, वाहन चालकांच्या चुकीमुळे किंवा वाहनातील बिघाडांमुळे होतात. भारतात सर्वाधिक मृत्यु हे रस्ते अपघाताने होतात व त्यात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे दगावणारांचे प्रमाण अधिक आहे. …अगदी माणसं बेवारसपणे रस्त्यावर पडून, वाहनांत अडकुन मृत्यु पावतात. दुर्दैव म्हणजे कोर्ट कचेरीच्या भानगडीत आपण पडू नये म्हणुन रस्त्यावर पडलेल्या मानवी देहाला प्रथोमोपचारासाठीही आपण नाकारतो व तेथुन बाजुला होतो.

जर आपल्या समुद्रातील एका सस्तन प्राण्याविषयी संवेदना जागृत ठेवुन असु तर मग रस्ते अपघातात मृत्युशय्येवर तडफडत असलेल्या माणसांविषयी आपल्या का संवेदना जागृत नसतात ? बरेचदा उत्तर मिळतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.

आपल्याला न्याय पाहिजे असतो तेव्हा आपण स्वत:पुरेसे न्याय व्यवस्थेत सहभागी होतो. पण रस्त्यावरच्या अपघातात आपण त्या व्यवस्थेला मदत किंवा सहभाग घेण्याचे टाळतो. कुठलीही व्यवस्था ही लोकसहभागातुन चालते हे आपण लक्षात ठेवायला हवे.

मित्रांनो रस्ते अपघातात जखमी झालेली माणसे किंवा प्राण्यांसाठी आपण देवदूत असतो. आज दुस-यासाठी आपण मदतीचा सुरुवात केली तर उदया कोणीतरी आपल्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी धावुन येईल.

आशिष बल्लाळ. चिपळूण


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here