चिपळूण – चिपळूण येथील मराठा समाजाच्या मोर्चात अनेक पक्षाचे नेते एकत्र आले होते. पण एकमेकाचे कट्टर राजकीय शत्रू असलेले आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम नुसते एकत्रच आले नाहीत, तर जाधवांनी चक्क रमेश कदामांना कडकडून मिठी देखील मारली, ही गळाभेट मोर्चात लक्षवेधी ठरली. उपस्थितांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या दोन्ही नेत्यांच्या मिठीचे जोरदार स्वागत देखील केले.
चिपळूणमध्ये मराठा समाजाने निषेध मोर्चाचे आज आयोजन केले होते. या मोर्चात मराठा समाजाचे नेते तसेच राजकीय नेते देखील सामील झाले होते. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचा सहभाग देखील अग्रभागी होता.आमदार शेखर निकम यांच्या गळ्यात हात टाकून भास्कर जाधव यांनी घोषणा दिल्या.तर दुसऱ्याच बाजूला उभे असलेले रमेश कदम यांना चक्क गळे मिठी मारून एक मराठा-लाख मराठा आशा जोरदार घोषणा दिली.हे दृश्य पाहून उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. रमेश कदम यांची राजकीय इनिंग काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली, तर भास्कर जाधव यांनी शिवसेना सारख्या जहाल विचारसरणीच्या पक्षातून आपली राजकीय सुरुवात केली. रमेश कदम चिपळूण शहरातून, तर भास्कर जाधव ग्रामीण भागातून नेतृत्व करत पुढे आले. पण सुरुवाती पासूनच दोघांचे जमेनासे झाले. पुढे राजकारणात एक-एक पायरी चढताना दोन्ही नेत्यामधील तेढ अधिक वाढत गेले आणि एकमेकांचे राजकीय वैरी देखील बनले. पुढे भास्कर जाधव राष्ट्रवादीत सामील झाले त्यावेळी दोघांची दिल जमाई झाली, परंतु ती फार काळ टिकली नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका करण्याची एक ही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांचे समर्थक देखील काही वेळा एकमेकांना भिडले. त्यातून हाणामाऱ्या, राडे असे प्रकार देखील घडले. त्यामुळे जाधव – कदम राजकीय वैर टोकाला पोहचले आणि गेले कित्येकवर्ष ते कायमही राहिले. भास्कर जाधव आणि रमेश कदम हे चिपळूणच्या राजकारणाची दोन टोके बनली. त्यामुळे एकत्र येण्याची श्यक्यता पूर्ण मावळली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा फार्म्युला अंमलात आल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील आघाडीची श्यक्यता वाढली. तसेच आमदार शेखर निकम यांनी अजित दादा पवार यांची साथ दिली, तर रमेश कदम शरद पवार यांच्या बरोबर राहिले. त्यामुळे जाधव-कदम एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाले. परंतु त्याला अद्याप तरी मृतस्वरूप आलेले नाही. मात्र सोमवारी चिपळूणात निघालेल्या मराठा मोर्चाने मात्र एकीचे शुभसंकेत दिले अशी चर्चा सुरू झाली आहे.