चिपळूण – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची आज शिवसेना नेतेपदी निवड झाली त्यामुळे आज चिपळूण, गुहागर मध्ये जल्लोष करण्यात आला.
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेड बरोबर युती केली म्हणून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. या टीकेला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. शिवसेना मात्र एकासोबत कायम राहिली, असे त्यांनी म्हंटले आहे.शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी, असे म्हणत टीका केली होती. यावर भास्कर जाधव उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. भाजपने आजवर ज्यांच्यासोबत म्हणजेच कै. विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांच्या पक्षाबरोबर युती केली. आज या सगळ्यांची अवस्था काय झाली हे बघताय, अशी टीका त्यांनी केली आहे.शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की तो मैत्री करतो व त्याला जागतो संभाजी ब्रिगेडबरोबर युती केली. त्याबद्दल मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो. संभाजी ब्रिगेडप्रमाणे महाराष्ट्रातील इतर पक्षांसोबत शिवसेनेने युती करायला हवी, असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.ज्यांच्या खांद्यावर मान ठेवली. त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हायजॅक करण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे यंदा दसरा मेळावा कोण घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. 56 दसरा मेळावा घेण्याचा विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एक चिन्ह एक झेंडा असलेला पक्ष शिवसेना आहे. शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष असून कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल. शिवसेनेच्या नादाला लागू नका, असा इशाराच भास्कर जाधवांनी शिंदे सरकाराला दिला आहे.