चिपळूण – गेली दोन दिवस चिपळुणात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवार १३ जुलै रोजी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु झाला. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी होत गेला. तरीही चिपळुणातील बाजारपुलाला पाणी लागले. बाजारपुलाच्या बाजूच्या सकल परिसरात थोड्याप्रमाणात पाणी शिरले होते. मात्र, याठिकाणी प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आलेली आहे. या पावसामुळे शिवनदीची पाण्याची पातळी हळुहळू वाढत आहे. मात्र, चिपळुणातील जनजीवन सुरळीत सुरु आहे. या आठवड्यामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले. चिपळूण शहरातील शिवनदी व वाशिष्ठी नदीच्या पातळीत सुद्धा पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र गतवर्षीच्या आठवणी आजही नागरिकांच्या मनात घर करून बसल्याने दिवसभर पाऊस जोरदार पडल्यामुळे व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. परंतु यावर्षी शिवनदी आणि वाशिष्ठी या नद्यांच्या पात्रातील नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून गाळ काढल्याने अजूनपर्यंत चिपळूण शहरातील बाजारपेठेत व इतर ठिकाणी पाणी शिरलेले नाही. मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्यामुळे नाईक कंपनी येथील बाजार पुलाला पाणी लागले. त्यामुळे बाजूच्या सकल भागामध्ये थोड्या प्रमाणात पाणी शिरले होते. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेले पाणी कमी-कमी होत गेले. बाजारपुलावरती पोलीस यंत्रणा सज्ज असून जनजीवन सुद्धा सुरळीत सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, संध्याकाळी किंवा रात्री पावसाने पुन्हा जोर धरल्यास नाईक कंपनीचा परिसर व इतर ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाच्या वतीने सुचित करण्यात आले आहे.