खेड – राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागांतर्गत असलेले खेड येथील बसस्थानक गेल्या कित्येक वर्षांपासून अतिशय तोकड्या जागेत सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक बसस्थानक सुसज्ज व मोकळ्या जागेत उभारली गेली असली तरी कोट्यवधी रुपये राज्यपरिवहन महामंडळाला मिळवून देणाऱ्या या स्थानकाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील संपादन केलेल्या जागेत नवीन बसस्थानक उभारले जात नसल्याने जनतेतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खेडला नवीन बसस्थानक उभारावे ही मागणी माजी पालकमंत्री रवींद्र वायकर व विद्यमान पालकमंत्री तथा परिवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्याकडे देखील निवेदन देऊन करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपून एसटी पुन्हा गतिमान झाल्याने या विषयाकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा प्रवासी व नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोकणातील प्रमुख शहरांपैकी खेड हे एक शहर आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक खेड तालुक्यात असल्याने प्रवाशांची मोठी संख्या येथे आहे. राज्यपरिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडे खेड बसस्थानकासाठी संपादित जागेवर नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने होत आहे. सन२०१८ मध्ये तत्कालीन विभागिय वाहतूक अधिकारी श्री.एस.जी.बोगरे यांनी दि. २४ डिसेंबर २०१८ रोजी खेड येथील खेड आगाराच्या नजिकच्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागेत लांब पल्ला व मध्यम पल्ल्याच्या गाड्यांसाठी तात्पुरते बसस्थानक सुरु करणेबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून या कामासाठी सुमारे सहा लाख रुपयांची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. खेड आगाराच्या नजिकच्या मोकळ्या जागेत नविन बसस्थानक बांधावयाचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे सन २०१८ पूर्वीच पाठविण्यात आला आहे. परन्तु प्रस्ताव पाठवून पाच वर्षे उलटली तरी अद्याप खेडमध्ये नवीन बसस्थानक उभारण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या खेड बसस्थानकातून दररोज ३९१ बसफेऱ्या सुरू आहेत. येथील आगारात ६५ चालक, ५५ वाहक, १७९ चालक तथा वाहक कार्यरत आहेत. खेडमधुन मुंबई, चिंचवड, पुणे, बोरिवली, लातूर, आंबेजोगाई, अर्नाळा, विठठलवाडी, कोल्हापूर, नालासोपारा आदी १५ मार्गावर लांब पल्याच्या गाड्या सुरू आहेत. या आगाराचे मासिक उत्पन्न सुमारे एक ते दीड कोटी रुपये असून दरवर्षी कोट्यवधी रुपये उत्पन्न देणाऱ्या या आगारात राज्यपरिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी सुविधा तोकड्या आहेत. सध्या खेड बसस्थानक ज्या जागेत आहे ती जागा होणारी दैनंदिन वाहतूकीसाठी अपूरे पडत असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसेसची संख्या अधिक व जागा कमी असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याचे खेड बसस्थानकातील काही नियते नवीन जागेत (गोळीबार मैदान) स्थलांतर करणेसाठी तात्पुरते चार गाळे असलेले बसस्थानक शेड उभारुन तात्पुरती व्यवस्था करणेबाबत प्रसिद्ध झालेल्या निविदेच्या अनुषंगाने संपादित जागेवर काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. एसटीच्या विभागिय कार्यालयाकडुन प्रस्ताव नुसार नवीन बसस्थानक उभारले जात नाही तो पर्यंत बसस्थानकासाठी संपादित जागेचा वापर लोकसहभागातून सुविधा उभ्या करून तात्पुरत्या स्वरूपात सुरू होऊ शकतो. मात्र त्यासाठी राजकीय इच्छा शक्ती गरजेची आहे. अन्यथा खेडमध्ये नवीन बसस्थानक कधी उभारणार? हा प्रश्न पुन्हा नीरुत्तरीत राहण्याची शक्यता आहे.