गुहागर – खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय १ जूनपासून बंद होत असल्याने नौका किनाऱ्यावर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मच्छीमारी हंगाम संपल्यामुळे लिलाव सेंटरही बंद होणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यासह गजबजाट असलेल्या दाभोळ बंदरावर आता दोन महिने शुकशुकाट दिसणार आहे. ऑक्टोबरपासून दाभोळ बंदर पुन्हा गजबजू लागेल. खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय १ जूनपासून बंद होत आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असल्यामुळे बंदरातील नौका किनाऱ्यावर घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बहुतांशी नौका किनाऱ्यावर घेतल्या आहेत तर उर्वरित नौका किनाऱ्यावर घेण्याची प्रक्रिया सुरू असून आठ-दहा दिवसांत नौका किनाऱ्यावर घेणे, जाळी धुणे, नौका शाकारणी ही कामे आटोपून उर्वरित खलाशीवर्ग आपल्या गावाकडे परतणार आहेत. महत्त्वाचा हंगाम समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी आलेले असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दर देखील चांगला मिळत असतो मात्र शेवटच्या टप्प्यात मासळी मिळत असताना शासनाने १ जूनपासून समुद्रातील मच्छीमारी बंदी कालावधी जाहीर केल्यामुळे मच्छीमारांचा व या व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यावसायिकही निराश झाले. यांत्रिकी नौकांची हंगामाची सुरुवात चांगली झाली. मात्र, मधील काळ निराशाजनक गेला.