चिपळूण- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक भागातील काम करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर हा घाट २५ एप्रिल ते २५ मे दरम्यान दररोज सहा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
अखेर घाट दि. २६ पासून परशुराम घाटातून चोवीस तास वाहतुकीसाठी खुला करणयात आला त्यामुळे कोकणसह जिल्हाभरातील एस.टी. वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून सुरळीत होणार आहे.चिपळूणनजीकच्या परशुराम घाटातील धोकादायक भागातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून ठेकेदार कंपन्यांशी चर्चा करून जिल्हाधिकार्यांनी परशुराम घाट दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल ७०० मीटर लांबीच्या एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात यश आले असून आगामी १५ जूनपर्यंत आणखी ३०० मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.