चिपळूण – येत्या पावसाळ्यात परशुराम घाटाच्या दुस्तीच्या कामानंतर सुरक्षेबाबत कोणतीही हमी देता येत नाही. त्यामुळे घाटातील वरच्या भागातील ११ आणि खालच्या भागातील ६० अशा एकूण ७१ स्थलांतराची तयारी ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने निवारा केंद्र उभारून त्या कुटूंबाना पूर्ण व्यवस्था करण्याचा निर्णही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच पर्यायी मार्गही सुस्थितीत येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट अतिशय धोकादायक बनला होता. वारंवार दरड कोसळून वाहतूक खोळंबा होत होता. येत्या पावसाळ्यामध्ये अतिशय ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे परशुराम घाटाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. घाटाच्या वरच्या भागातील दरडी कधीही घसरण्याची शक्यता होती. हा धोका कमी करण्यासाठी ती दरडी हटवण्याचे काम हाती घेऊन चौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले; मात्र काम सुरू असतानाच जेसीबी घसरून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एका कामगाराला जीव गमवावा लागला. दरडी हटवण्याचे काम मोठे होते आणि पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे होते. त्यामुळे या घाटातील वाहतूक बंद करून हे काम वेगाने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.