रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या महिनाभरात कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी अशा प्रवाशांकडून सुमारे ५६ लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.करोनामुळे गेली दोन वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. दुसऱ्या लाटेमध्ये काही मोजक्याच गाडय़ा सोडण्यात येत होत्या.
आता या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. गर्दी आणि शारीरिक अंतर राखण्यासाठी सर्वसाधारण डबे जोडले जात नव्हते. आती पुन्हा ती व्यवस्था केली जात आहे. परंतू एसटी वाहतूक अस्थिर असल्याने कोकण रेल्वेवर जास्त भार पडत आहे. मुंबईहून कोकणात येणारा प्रवासी वर्ग रेल्वेचा आधार घेतो. त्यामुळे सर्वच गाडय़ांची आरक्षण यादी वाढते. ऑनलाईन तिकीट मिळाले नाही तर ते रद्द होते. अशा वेळी काही प्रवासी विनातिकिट डब्यात चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन असा प्रवास करणाऱ्यांविरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत एकूण ८ हजार ६३३ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे