मुंबई – पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे. मात्र, तोपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करू शकते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
कामगारांना कामावरून न काढण्याविषयी न्यायालयाने महामंडळाला सूचना केली. सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जगण्याचे साधन हिरावून घेऊ नका, असे न्यायालयाने नमूद केलं. मात्र, तरी देखील १५ तारखेपर्यंत कामावर रुजू न झाल्यास महामंडळ कारवाईसाठी मोकळे असल्याचं न्यायालयाने नमूद केले.