१२ वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; गुहागर पोलिसांच्या भक्कम तपासामुळे दोघांना जन्मठेप

0
181
बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. गुहागर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७/२०१४ (भादंवि कलम ३०२, ३९४, ३४) या प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. डी. बी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाडवे (रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशीही शिक्षा ठोठावली. तर विष्णू किसन कनपुरे (रा. पुणे) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या गाजलेल्या प्रकरणात गुहागर पोलिसांनी केलेला सखोल, शास्त्रीय आणि पुराव्यांवर आधारित तपास हा निकालाचा कणा ठरला. तपासादरम्यान जमा करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात सरकारी पक्षाने भक्कम बाजू मांडली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विनीत , पोहवा/ आशिष बल्लाळ, प्रकाश मोरे तसेच एस. एल. पाटील यांनी केला. सध्या गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याची प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील अॅड. पी. आर. साळवी यांनी प्रभावीपणे मांडली. तर पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील आणि हेड कॉन्स्टेबल ए. एस. शिंदे यांनी सातत्याने मेहनत घेतली. तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आलेला हा निकाल गुहागर पोलिसांच्या तपासकौशल्याचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा मोठा विजय मानला जात आहे. “गुन्हा कितीही जुना असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही,” हा संदेश या निकालातून पुन्हा अधोरेखित झाला असून, गुहागर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here