चिपळूण – कोकणातील शेतकऱ्यांना शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाची मजबूत जोड देत आर्थिक स्वावलंबनाकडे नेणाऱ्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा निर्धार व्यक्त करत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी, “वाशिष्ठी डेअरीने शेतकऱ्यांसाठी आधाराची भक्कम व्यवस्था उभी केली असून या उपक्रमाला सर्वांनी साथ देणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.
हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण नागरीच्या सहकार भवनात आयोजित या कृषी मेळाव्याला शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाच्या कृषी विभागातर्फे नोंदणीकृत शेतकऱ्यांना काजू रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, माजी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय सोनावले, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राम कुलकर्णी, डॉ. सोपान शिंदे आणि शासनाच्या उद्यानपंडित पुरस्काराने सन्मानित धनंजय केतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकाराची मजबूत पायाभरणी झाली. त्याच विचारातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. आज हा प्रकल्प केवळ दूध संकलनापुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा आधार बनला आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तर प्रास्ताविकात अध्यक्ष प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीचा आढावा घेताना, या प्रकल्पामागे सुभाषराव चव्हाण यांची प्रेरणा असल्याचे सांगितले. दुग्ध व्यवसाय, पशुपालन आणि शेळीपालनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ताकद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी आणि पूरक व्यवसायांना चालना देत कोकण अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया,” असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी दिनाच्या निमित्ताने झालेला हा मेळावा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता शेतकरी, सहकार आणि कृषी विकास यांना जोडणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
















