दिल्ली – संतोष परब हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयात नितेश राणे यांनी हजर रहावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यावेळी याप्रकरणातील संशयित आरोपी मनीष दळवी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. ही घटना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवण्यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे राजकीय सूड म्हणून नितेश यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, असा दावा पोलिसांनी उच्च न्यायालयात केला होता. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नितेश यांना जामीन देण्यास नकार दिला होता.