गुहागर- राज्यभरात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे गेल्या 50 दिवसांपासून संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गुहागर आगारातील सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
या बाबत गुहागर मधील एस.टी. कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात एस. टी कर्मचारी दुखवट्यात आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल असे वाटत असताना आता बढतर्फीची कारवाई सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एस. टी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही शासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आल्याचे निवेदनात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नसेल आणि आमचे एसटी कर्मचारी बांधव आत्महत्या करीत असल्याने कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटू लागल्याने आम्हाला “इच्छा मरणाची परवानगी मिळावी” असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. निवेदनावर 300 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.