नवीदिल्ली- बैलगाडी शर्यतीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने दाखल केलेल्या करण्यात आलेल्या याचिकेवर आज गुरुवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिली आहे. यामुळे राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींचा धुरळा उडणार आहे.
राज्यातील विविध भागांत दिवाळीमध्ये बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येते. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये शर्यतींवर बंदी घातली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने ही याचिका दाखल केली हाेती. बंदी उठविण्यासाठी आणि बैलांचा सराव सुरु व्हावा यासाठी काही नियम व अटींसह परवानगी द्यावी, अशी मागणी बैलगाडा संघटना, शर्यतप्रेमी आणि शेतकऱ्यांतून मागील काही वर्ष होत आहे. बैलगाड्यांची जुनी संस्कृती आणि परंपरेचे जतन करुन खिलार जातीचे संगोपन व्हावे, यासाठीही ही परवानगी गरजेची आहे, या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी बैलगाड्यांसह संघटनांनी मोर्चा काढले आहेत. तामिळनाडूमधील ‘जल्लीकट्टू’ या बैलांच्या थरारक खेळाला राज्य सरकारने परवानगी दिली होती. यासाठी अद्यादेश काढला. त्याच धर्तीवर बैलगाडा शर्यतीसाठी अद्यादेश काढावा, अशीही मागणीही संघटनांकडून करण्यात आली होती.