चिपळूण : मोदी सरकार हे सर्वसामान्यांची लूट करणारे सरकार आहे. या सरकारला सत्तेवरून खाली खेचून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन सज्ज राहा, असे आवाहन काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यांनी बुधवारी (ता. 24) केले. तालुक्यातील दळवटणे भुवडवाडी येथील गणेश मंदिरात काँग्रेसच्या जनजागरण अभियानानिमित्त सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुणांसह महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी राऊत पुढे म्हणाले, की केंद्र सरकारकडून केवळ अन्याय आणि अत्याचार सुरू आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे, याची जाणीव करून देण्यासाठी जनजागरण अभियान आहे. आजचे सरकार सर्वसामान्यांपेक्षा उद्योगपतींच्या हिताचा विचार अधिक करत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा परत आलाच नाही, उलट देशाची अर्थव्यवस्था कोसळली, गरीबांचे अधिक हाल झाले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेची लूट करणाऱ्या या सरकारच्या विरोधा काँग्रेसने लढा पुकारला आहे. तुम्ही सारे या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हा आणि या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही राऊत यांनी केले.
विकासाचे व्हीजन केवळ काँग्रेसकडे : प्रशांत यादव
काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हे, तर एक विचारधारा आहे. जुनी मंडळी आजही काँग्रेसवर प्रेम करतात. काँग्रेसच्या काळातच ग्रामीण भागाचा, शहराचा पर्यायाने देशाचा विकास झाला, हे कोणीही नाकारू शकत नाही. मोदी सरकारने केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली. आता विकासाची पालखी व्हायची असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. विकासाचे व्हीजन केवळ काँग्रेसकडेच आहे, असे मत यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केले. काँग्रेस आता बदलत आहे. तरुणांना संधी आणि जुन्या काँग्रेसप्रेमींचा सन्मान, महिलांना सन्मानाची वागणूक हे केवळ काँग्रेसमध्ये मिळू शकते. काँग्रेसपासून दुरावलेल्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी आम्ही जनजागरण अभियानाच्या माध्यमातून गावोगावी, वाडी-वाडीवर पोहचत आहोत. तरुणांनी आता भूलथापांना बळी न पडता सत्याची कास धरावी, असे आवानही यावेळी श्री. यादव यांनी केले.