गुहागर – गेले काही दिवस गुहागर तालुक्यातून ८ सहकार सोसायट्यांचे मतदानाचे हक्क जाणीवपूर्वक हिरावून घेतल्याने गुहागर तालुक्यात संतापाची लाट आली आहे. सध्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला राजकीय वलय लागले आहे. सुमारे २ हजार मतदारांपैकी १७५ मतदारांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विकास सेवा सहकारी सोसायट्या हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कणा आहे. यातील काही संस्थाना आयत्यावेळी मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गुहागर तालुक्यातून होत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्था व पगारदार नोकरांच्या संस्थांचे प्रतिनिधीदेखील जिल्हा बँकेचे मतदार आहेत.
मात्र जिल्ह्यातील बहुतांशी गृहनिर्माण संस्थाना याची माहितीच देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सुमारे २ हजार गृहनिर्माण सहकारी संस्था असताना मतदार यादीत या घटकांचे अवघे १७५ मतदार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील अनेक गृहनिर्माण संस्था मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक दि. १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. २१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी दि. २२ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सहकार ग्रुप निवडणूक रिंगणात उतरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप पुरस्कृत उमेद्वारांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागांवर उमेद्वार दिले आहेत. त्यातच चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयद्र्थ खताते यांनी स्वतंत्र ग्रुपच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले तर गुहागरातून चंद्रकांत बाईत हे विकास संस्थेतून सचिन बाईत हे जिल्हा मागास विशेष प्रवर्गातून तर स्नेहल बाईत महिला राखीव यामधून अर्ज दाखल केले आहेत. यावेळी गुहागर तालुक्यातील २२ सहकारी संस्थांचे मतदार चेअरमन व संचालक हजर होते.